पाळज येथील नदीतच्या पुरात वडील गेले वाहून; तर मुलगा सुदैवाने बचावला
तहसिलदार विनोद गुंडमवार व पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी घटनास्थळी दिली भेट व पिडीतांच्या कुटूंबियांना दिला धीर

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असल्याने नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत.याच दरम्यान दि.२७ सप्टेंबर रोजी पाळज येथील एक शेतकरी व त्यांचा मुलगा बैलगाडीतून नदीपात्र ओलांडून येत असतांना त्यांना पुराच्या पाण्याचा अंदाज लागला नाही व त्यांचा तोल गेल्याने ते दोघे वाहून गेले.पुराच्या पाण्यात एका दगडाचा सहारा मुलास मिळाल्याने सुदैवाने तो बचावला,परंतू वाहून गेलेल्या वडीलांचा शोध घेण्यात रात्री उशिरा पर्यंत ही यश आले नाही.तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार व पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि पीडित शेतकरी कुटूंबियांना धीर दिला.तसेच नागरिकांच्या मदतीने वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे शोधकार्य सुरु केले.
लक्ष्मीनारायण लसमन्ना पुस्पूरवाड (४७) व त्यांचा मुलगा अजय लक्ष्मीनारायण पुस्पूरवाड (२३) दोघे ही रा.पाळज ता.भोकर हे शेतकरी पिता पुत्र नेहमी प्रमाणे दि.२७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी आपल्या शेतात गेले होते. यावेळी महालक्ष्मी नदीपात्रात पाणी कमी होते.परंतू दुपारी झालेल्या परतीच्या पावसाने ही नदी दुथडी वाहू लागली.शेतातील कामे आटोपून सायंकाळी ५:०० वाजताच्या दरम्यान शेतकरी लक्ष्मीनारायण लसमन्ना पुस्पुरवाड व त्यांचा मुलगा अजय लक्ष्मीनारायण पुस्पुरवाड हे दोघे पाऊस पडत असल्याने आपली जनावरे सोबत घेऊन बैलगाडीने घरी परत येत होते.नदी ओलांडून येत असतांना नदी पात्रातील पुराच्या पाण्याच्या दाबाचा त्यांना अंदाज आला नाही व लोंढ्याचा धक्का बसल्याने ते दोघे ही बैलगाडीतून पुराच्या पाण्यात पडले.जनावरे व बैलगाडीला जुंपलेले बैल कसेबसे नदी पात्राबाहेर पडले.परतू हे शेतकरी पिता पुत्र वाहून गेले.वाहून जात असलेल्या पुत्रास एका मोठ्या दगडाचा सहारा भेटला व तो पाणी प्रवाहात पुढे वाहून गेला नाही.यामुळे सुदैवाने तो बचावला.परंतू वडील मात्र वाहून गेले. गावातील नागरिकांना याबाबदची माहिती मिळताच अनेकजण मदतीसाठी घटनास्थळी धावून गेले व दगडाघा सहारा घेऊन जीव मुठीत घेवून थांबलेल्या अजय पुस्पुरवाड यास नदीपात्राबाहेर काढले आणि वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरु केला.ही माहिती महसूल व पोलीस प्रशासनास मिळताच तहसिलदार विनोद गुंडमवार व पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि नागरिकांच्या मदतीने वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे शोधकार्य सुरु केले.याच बरोबर त्या पीडित शेतकरी कुटूंबाची भेट घेऊन धीर दिला.सुदैवाने मुलगा बचावला,परंतू वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध घेण्यात रात्री उशिरापर्यंत यश आले नसल्याचे सांगितले गेले.
ही घटना सर्वांनी लक्षात घ्यावी व नदी,नाल्यास पुर आलेला असतांना शेतकरी आणि नागरिकांनी विनाकारणचे धाडस करून पुराच्या पाण्याचा अंदाज न घेता नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करु नये,तसेच सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करावा,असे आवाहन तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.




