शेतकारी बांधवांनो आपल्या रब्बी पिकांचा पीक विमा आवश्य काढा-दिलीप जाधव
पीक विमा पोर्टल सुरु झाले असल्याने भोकर तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे आवाहन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२५-२६ साठी शेतकऱ्यांनी सदर योजनेत सहभाग घेणेसाठी पीक विमा नोंदणीचे पोर्टल सुरू झाले असून दि.१० नोव्हेंबर पर्यंत नांदेड जिल्ह्यातील ७२४ अर्जाची विमा नोंदणी झाली आहे.विमा योजनेत सहभाग घेणेसाठी ज्वारी पिकासाठी दि.३० नोव्हेंबर,तर गहू,हरभरा, पिकासाठी दि.१५ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे.तरी भोकर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी पिकांचा पिक विमा आवश्य काढून घ्यावा,असे आवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.

सदरील योजना ही अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असून प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार,तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के,रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रबी हंगामातील नगदी पिकांसाती ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या १ वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वषर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाध्या ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल,या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे, तसेच, इतर अवैध मार्गानी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल,योजनेमध्ये सहभागासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य आहे.पीक विमा नुकसान भरपाईसाठी,ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.
जोखमीच्या बाबी:- योजनेअंतर्गत रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे/तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील.

रब्बी हंगामातील समाविष्ट पिके व त्यासाठीचा विमा हप्ता पुढील प्रमाणे आहे.गहू (बा.):- विमा संरक्षित रक्कम (रु.) प्रति हे.४५००० व शेतकरी हिस्सा रक्कम-४५० रु.असून यासाठी विमा लागू असलेले तालुके पुढील प्रमाणे आहेत.नांदेड,अर्धापूर, मुदखेड,बिलोली,लोहा,कंधार, नायगाव,धर्माबाद,किनवट,हिमायतनगर,भोकर,हदगाव. तसेच पीक विमा भरण्याची अंतिम तारीख-१५ डिसेंबर २०२५ आहे.
ज्वारी (जि.):- विमा संरक्षित रक्कम (रु.) प्रति हे.३६००० व शेतकरी हिस्सा रक्कम-३६० रु.असून यासाठी लागू असलेले तालुके पुढील प्रमाणे आहेत.नांदेड,देगलूर, नायगाव,बिलोली,मुखेड,धर्माबाद,किनवट,हदगाव.तसेच या पिकासाठी विमा भरण्याची अंतिम तारीख दि.३० नोव्हेंबर २०२५ आहे.
हरभरा :- विमा संरक्षित रक्कम (रु.) प्रति हे.३६००० व शेतकरी हिस्सा रक्कम-३६० रु.असून यासाठी लागू असलेले तालुके पुढील प्रमाणे आहेत.नांदेड,अर्धापूर, मुदखेड,लोहा,कंधार,नायगाव,बिलोली,मुखेड,देगलूर, धर्माबाद,किनवट,माहूर,हिमायतनगर,भोकर,हदगाव, उमरी.तसेच या पिकासाठी विमा भरण्याची अंतिम तारीख दि.१५ डिसेंबर २०२५ आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी,मुंबई क्षेत्रीय कार्यालय,लोकचेंबर्स,मरोळ मरोशी रोड,मरोळ, अंधेरी पूर्व,मुंबई, महाराष्ट्र- ४०० ०५९ ई-मेल : pikvima@aicofindia.com या विमा कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.तर या विमा योजनेअंतर्गत जोखिमीअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून निश्चित केली जाते.तसेच सदरील
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यक्ता असते.आधार कार्ड,बैंक पासबुक, पिक पेरा स्वंय घोषणापत्र,७/१२,आठ अ व (Farmer ID) शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK).तरी या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा.तसेच ज्वारी पिकासाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख दि.३० नोव्हेंबर २०२५ व गहू (बा.) आणि हरभरा या पिकासाठी १५ डिसेंबर २०२५ असून या मध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याने शेवटच्या दिवसांची वाट न पाहता भोकर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.




